शेवग्याचा थेपला
- Ketaki
- Aug 5, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
माणसाची सर्व सोय निसर्गाने योग्य रीतीने सर्वत्र करून ठेवलेली आहे. प्रश्न फक्त आपण जिथे आहोत तिथल्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा मान राखून त्यांबरोबर खेळीमेळीने राहण्याचा आहे.

मेथीची पालेभाजी इथे सहज मिळत नाही. थंडीच्या दिवसात काही महिने आठवड्यातून २/३ वेळा दिल्लीहून मेथी येते आणि त्यात वर्षभराचं समाधान मानावं लागतं. हॉटेल मधल्या चविष्ट भाज्यांचं सिक्रेट समजली जाणारी कसुरी मेथी, म्हणजेच सुकवलेली मेथीची पानं, काही प्रमाणात मेथीच्या स्वादाची कमतरता भरून काढतात. थेपल्यामध्ये किंवा पुऱ्यांमध्ये कसुरी मेथी घातली तर खूप छान स्वाद येतो. पण ताज्या मेथीची सर त्याला कधीच येत नाही - पोषकतत्वांच्या दृष्टीनेही आणि अन्नपदार्थांच्या texture च्या दृष्टीनेही.
मी मुंबईत करायचे त्यापेक्षा हाँगकाँगला येऊन इतर भाज्यांचे/पालेभाज्यांचे ठेपले/पराठे खूप जास्त करायला लागले - पालक, गाजर-मुळा, दुधीचे, कांद्याच्या पातीचे आणि माठाचेही. मध्यंतरी असं कळलं की काही दुकानात शेवग्याचा पाला मिळतो आणि एक युक्ती सुचली. शेवग्याची पानं आणि कसुरी मेथी घालून थेपले केले आणि ते ताज्या मेथीचे थेपले असल्यासारखेच झाले आणि मी काही सांगेपर्यंत कुणाला कळलंही नाही की ती पानं मेथीची नसून शेवग्याची आहेत!
माझ्या आजोळी मोठं शेवग्याचं/शेकटाचं झाड होतं. त्याला किती शेंगा लगडलेल्या असायच्या! पांढरी फुलं आणि हिरवी गर्द पानं. दाराशीच असल्याने, अतिपरिचयात् अवज्ञा म्हणून की काय, कधी त्या एवढ्या मोठ्या वृक्षाबद्दल कुतूहल किंवा जिज्ञासा वाटलेली आठवत नाही. मुंबईतही शेवग्याच्या शेंगा बारा महिने सहज मिळायच्या. पण त्याची पानं काही विशिष्ट दुकानांतच मिळायची. डॉ. मालती कारवारकरांच्या पुस्तकांतून शेवग्याच्या पाल्याचं महत्व मी पहिल्यांदा वाचलं. त्यानंतर यूट्यूब वर मोरिंगा - म्हणजेच शेवगा - या विषयावर एक माहितीपट बघितला. ज्या दुष्काळग्रस्त, पावसाचे प्रमाण कमी असलेल्या उष्णकटिबंधातील प्रदेशांत काहीही उगवणं कठीण असतं तिथे शेवगा सहज रुजतो आणि भरपूर वाढतो. आफ्रिकेतल्या काही गरीब देशांमध्ये शेवगा नैसर्गिकरित्या होतो. तिथे गरिबीमुळे लहान मुलांच्यात असलेले गंभीर कुपोषण हे फक्त शेवग्याची पानं आहारात समाविष्ट करून कसं आटोक्यात आणलं गेलं हे त्या माहितीपटात बघितलं आणि वाटलं की निसर्ग भेदभाव करत नसतो. माणसाची सर्व सोय निसर्गाने योग्य रीतीने सर्वत्र करून ठेवलेली आहे. प्रश्न फक्त आपण जिथे आहोत तिथल्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा मान राखून त्यांबरोबर खेळीमेळीने राहण्याचा आहे.
Comments