top of page

शीरा

  • Ketaki
  • Jul 29, 2020
  • 1 min read

Updated: Oct 8, 2022

शीरा करायचाच असेल तर मोकळ्या मनाने, मोकळया हाताने करावा, भरपूर गोड आणि भरपूर साजूक तूप घालून



मनुष्याचे गोड चवीच्या अन्नाबरोबर खूप जुने संबंध आहेत. फार पूर्वी आदिमानवाच्या काळात किंवा त्याहूनही आधी जेव्हा शारीरिक कष्ट हाच नियम होता तेव्हा ऊर्जा सहज उपलब्ध होईल अशा पदार्थांचं सेवन व्हायचं. निसर्गातील असे पदार्थ म्हणजे फळं - चवीला गोड आणि त्या प्रकारच्या शारीरिक कष्टात शरीराला आवश्यक ती ऊर्जा आणि पोषण देऊ शकणारी. असंही म्हणतात की निसर्गात चवीला गोड पण विषारी असे पदार्थ फार कमी आहेत. त्यामुळे गोड चवीच्या पदार्थाचा सुरक्षिततेशी संबंध ही माणसाच्या मेंदूत फार पूर्वीपासून जोडला गेलेला आहे. त्यामुळेच की काय गोड चव ही माणसाला आनंदी बनवते, आपले त्रास, दुःख क्षणिक विसरू देते.


जसजशी उत्क्रांती झाली तशी माणसं बदलली, त्यांच्या गरजा बदलल्या पण मेंदूतलं गोड चवीशी असलेलं घट्ट नातं काही बदललं नाही. सण-समारंभ-शुभ प्रसंग म्हणजे आनंद, आणि आनंद म्हणजे गोड अन्न असं साधं समीकरण जगभर सापडतं. आता फळांच्या गोडपणाची जागा साखरेनं घेतली आहे आणि तेव्हढ्यानेच पुरत नाही म्हणून त्यात भरपूर तेल तूप घालून माणूस आपला आनंद द्विगुणित करतो!


गोड शीरा - आमची आजची न्याहारी. शीरा करायचाच असेल तर मोकळ्या मनाने, मोकळया हाताने करावा. भरपूर गोड आणि भरपूर साजूक तूप घालून. त्यात केळं घातलं की वेगळीच चव येते. खावा पण अगदी शांत चित्ताने - एकेक कणाचा आस्वाद घेत, त्या चवीतून येणारी मानसिक सुरक्षितता अनुभवत, आपण आपल्या आयुष्यात जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक कष्ट करतो त्यांचा रास्त अभिमान बाळगत, अन्नपूर्णेचे आभार मानत आणि आपल्या आत खोलवर दडलेल्या त्या आदिमानवाला समर्पित करत!

Comments


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page